पुस्तकविना वाचनालय – केवळ कागदोपत्री अस्तित्व
तहाडी येथे स्थापन केलेले वाचनालय हे केवळ नावापुरते आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत मंजूर झालेला निधी पुस्तक खरेदीसाठी वापरावा असा हेतू असतानाही येथे नवे ग्रंथ, ज्ञानकोश, आधुनिक माहिती असलेली मासिके वा अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तकं काहीच उपलब्ध नाही. वाचनालयात जी पुस्तके आहेत ती जुनी, फाटकी, कालबाह्य आणि विद्यार्थ्यांना कोणतीही शैक्षणिक मदत करू शकणार नाहीत अशा स्वरूपाची आहेत.
गावातील काही युवक सांगतात, आम्ही अजून पर्यंत गावात वाचनालय कुठे आहे तेच माहीत नाही
बसायलाही जागा नाही; वाचनासाठी वातावरणच नाही
या वाचनालयात मुलांनी अभ्यास करावा, शांतपणे बसून ज्ञान मिळवावं, हीच संकल्पना मूळातच हरवलेली आहे. कारण वाचनालयात कोणतीही बसायची व्यवस्था नाही. खुर्च्या नाहीत, टेबल नाही, पंखा नाही, दिवा नाही – एकंदरीत अभ्यास करण्यासाठी आवश्यक ती कोणतीही मूलभूत सोय उपलब्ध नाही. इतकंच नव्हे तर काही वेळा छप्पर गळतं, आणि पावसाळ्यात तर हे वाचनालय पूर्णपणे बंदच राहतं.
एका ग्रामस्थाच्या भाषेत सांगायचं झालं, “हे वाचनालय नाही, तर एक मोकळं, बेवारस खोली आहे. केवळ नावासाठीच त्याला वाचनालय म्हणतात.”
वाचनालय सतत कुलूपबंद – जबाबदार कोण?
या वाचनालयाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ते कायमस्वरूपी बंद असतं. नियमित वेळ नाही, कर्मचारी नाही, कोण उघडणार हेच ठरलेलं नाही. वाचनालयाचा दरवाजा दररोज बंद असतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अनेकांनी विचारणा केली, निवेदनं दिली तरी कोणताही ठोस बदल झाला नाही.
शासन निधी कुठे गेला? – अपारदर्शक खर्चावर संशयळ
शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी वाचनालयासाठी मंजूर होतो. यामध्ये ग्रंथ खरेदी, फर्निचर, वृत्तपत्र/मासिक सदस्यता, संगणक सुविधा, कर्मचारी मानधन आदींसाठी विशेष तरतूद असते. मात्र तहाडी गावाच्या वाचनालयात यापैकी काहीही दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय आहे की हा निधी वापरला जातोय का? वापरला जात असेल तर कुठे जातो? आणि जर निधीच मिळाला नसेल, तर गावाने लेखी तक्रार का केली नाही?
विद्यार्थ्यांच्या हक्कांची पायमल्ली – गाव सोडून दुसरीकडे अभ्यास
तहाडी गावातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी, तलाठी, लिपिक, इत्यादी परीक्षांसाठी त्यांना दर्जेदार वाचनसामग्री आणि अभ्यासाचं वातावरण हवं असतं. मात्र वाचनालयाचा उपयोग करता न आल्यामुळे त्यांना शेजारील गावात जावे लागते किंवा शहरात जाऊन खासगी वाचनालयांचा खर्च करावा लागतो. हे आर्थिकदृष्ट्या सर्वांनाच शक्य नसते.
ग्रामस्थांचा आवाज – ‘वाचनालय नसले म्हणजे शिक्षणावर आघात’
गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, पालक, महिला आणि युवक आता संगठित होत आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीला आणि तालुका प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली आहेत. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, “शासनाची योजना चांगली आहे, पण अंमलबजावणी केवळ कागदावर. दोषी कोण हे तपासून कारवाई व्हावी.”
मागण्या – आता तरी जागे व्हा!
तहाडी वाचनालयाची तातडीने पाहणी करावी.
वाचनालय नियमित सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी नेमावा.
नव्या पुस्तकांची खरेदी करून अद्ययावत ग्रंथसंग्रह तयार करावा.मासिके, वृत्तपत्रे नियमित येण्यासाठी सदस्यता घ्यावी.
अभ्यासासाठी फर्निचर व लाईटची व्यवस्था करावी.
निधीच्या वापराबाबत संपूर्ण लेखा जोखा ग्रामसभेसमोर सादर करावा.
दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
निष्कर्ष:
तहाडी गावातील वाचनालय हे शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा अपमान करणारे उदाहरण ठरले आहे. वाचनालय असणे ही फक्त शासकीय रेकॉर्ड भरण्याची बाब नाही, तर ती लोकांच्या विकासाची उभारणी आहे. जेव्हा एका संधीचीही चोरी केली जाते, तेव्हा ते फक्त निधीचा नाही, तर संपूर्ण पिढीच्या भविष्याचा अपहार असतो. शासन आणि प्रशासनाने हे लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करावी, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.